लोकसेवा - समाजसेवा
२०२१मध्ये पहिल्यांदा मणिपूरच्या भूमीत पाऊल ठेवलं तेव्हा या देवभूमीतला प्रवास आपलं आख्खं आयुष्य बदलून टाकणार आहे हे अनंत अल्लीशे या ध्येयवेड्या युवकाला माहिती नव्हतं. पण तसं घडलं. मणिपूरच्या पहाडांतून बराक नदी उगम पावते. तिथल्या अतीदुर्गम भागापासून इम्फाळच्या मैदानी प्रदेशात सलग ३ महिने अल्लीशे यांनी भटकंती केली. भाग नवीन. भाषा वेगळी. लोकजीवन आणि परंपराही अपरिचित. आपल्याच देशातल्या एका अती-दुर्लक्षित भागात फिरताना त्यांच्या मनातली अस्वस्थता सतत वाढतच गेली. त्या भटकंतीत त्यांच्या लक्षात आलं की इथे श्रीमंतांच्या मुलांना शिक्षण आहे, पण गरिबाच्या लेकरांचं काय? आपल्याच देशबांधवांची ही लेकरं शिकली पाहिजेत, म्हणून घरोघर जाऊन पालकांशी बोलून, त्यांची समजूत काढून, त्यांना परोपरीने पटवून पाचवी इयत्तेत शिकणारं एकेक मूल त्यांनी सोलापुरात आणणं सुरू केलं, आणि सुरू झाला एक विलक्षण प्रवास : मिशन मणिपूर!
अनंत अल्लीशे दरवर्षी दोन महिने मणिपुरात डोंगरदऱ्या पिंजून काढतात. शिक्षणाबाहेर असलेली मुलं शोधतात. त्यांच्या आईवडिलांच्या अक्षरश: हातापाया पडतात. आपला पोटचा गोळा स्वाधीन करण्याइतपत त्यांचा विश्वास जिंकतात आणि त्यांचं मूल घेऊन सोलापुरात येतात. इथे ज्ञानप्रबोधिनी संस्थेत ही मुलं शिकतात. पूर्व सीमाविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. मणिपुरात आणलेल्या मुलांचा ‘बाबा पालक’ होऊन पदवीपर्यंत त्या मुलांची सोबत करायची जबाबदारी अनंत अल्लीशे यांनी उचलली आहे. दुर्गम भागातली गरिबी, शिक्षणाचा अभाव, सभोवताली व्यसनाधीनता आणि हिंसाचार यातून ही मुलं महाराष्ट्रात सोलापूरमध्ये येऊन शिकतात. स्वत:कडे असलेली विज्ञानाची पदवी आणि शिक्षकी नोकरी बाजूला ठेवून मणिुपरी मुलांच्या शिक्षणासाठी अल्लीशे यांनी स्वत:ला झोकून दिलं. ते सांगतात, “मुलांनी शिकायला हवं, या पलिकडे मला कुठला ध्यास नाही, माझी कुठली दुसरी इच्छा नाही, माझं कुठलं दुसरं काम नाही. हेच माझं काम, हेच सर्वस्व!
गोष्ट १९८३ सालातली. नगर जिल्ह्यातल्या नागरदेवळे गावातली. जालिंदर नावाचा तरुण. दहावी पास. नोकरी मिळत नव्हती आणि घरची गरिबी त्यामुळे जालिंदर मजुरी करून उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवत असे. त्याच्या आईच्या डोळ्याला मोतीबिंदू झालेला. तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती. पण नागरदेवळासारख्या गावात उपचाराची सोय नव्हती. जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया व्हायच्या; पण त्यासाठी नंबर लावावा लागायचा. वेटिंग लिस्ट मोठी असायची. महिनोन्महिने नंबर लागायचा नाही. खासगी दवाखान्यात सोय होती, पण आधी पैसे भरावे लागायचे. पण पैशांची अडचण होती.
या सगळ्या अडचणीत शस्त्रक्रिया झालीच नाही आणि जालिंदरच्या आईचा डोळा गेला. तेव्हा जालिंदरला खूप वाईट वाटलं. आईचा डोळा आपण वाचवू शकलो नाही, याची सल त्याला बोचत होती. मोतीबिंदू, डोळ्यांच्या समस्या असलेले आणि उपचारासाठी पैसे नसलेले अनेकजण जालिंदरला दिसू लागले. आईच्या गेलेल्या डोळ्याची भरपाई करण्याचा मार्ग जालिंदरला दिसला. पैशांअभावी डोळ्यांच्या समस्यांवर उपचार करू शकत नसलेल्यांसाठी मोफत शिबिर भरवण्याची कल्पना त्याला सुचली. धडपड करून, स्वत: पैसे खर्च करून त्याने पहिलं शिबिर भरवलं आणि नागरदेवळे गावात जालिंदर बोरुडे नावाच्या नेत्रदूताचा जन्म झाला. १९९१ साली जालिंदर बोरुडे यांनी ‘फिनिक्स सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून नेत्रदानाची चळवळ सुरू केली. विडी कामगार, शेतकरी, मजूर, हमाल, महिला आणि गरिबांसाठी ते अहोरात्र झटतात. जिल्ह्यातील विविध भागांत दरमहा पाच नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करतात. त्याचा लाभ जिल्ह्यासह राज्यातील गरजू घटकांना होत आहे. गेली ३३ वर्षे नेत्रदान आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियांच्या माध्यमातून त्यांनी लाखो गरजूंना प्रकाश दाखविला. आतापर्यंत १,१६० अंधांना मरणोत्तर नेत्रदानातून नवदृष्टी मिळाली. तर ३ लाख ७६ हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मोफत नेत्र उपचार आणि आधुनिक सेवा देणारे फिनिक्स नेत्रालय उभारण्यासाठी आता बोरुडे यांचे प्रयत्न सुरू आहेत.
वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी शेतातली फळं खाल्ली म्हणून एका शेतकऱ्याने या मुलाला तीन तास दोरीने बांधून ठेवलं होतं. पुढे एकदा दुष्काळ पडला असताना शिकार मिळत नाही म्हणून त्याच्या वडिलांनी दुसऱ्याच्या शेतातली सहा ज्वारीची कणसं तोडली. तर त्या मुलाच्या वडिलांना ‘चोर’ ठरवून सहा क्विंटल ज्वारी चोरली या आरोपाखाली शिक्षा झाली. हे असलं सगळं अनुभवतच लहानाचा मोठा झाला हा मुलगा. त्याचं नाव मतीन भोसले. स्वतः फासेपारधी समाजातील असल्यामुळे लहानपणापासून फक्त अन्यायच वाट्याला आला त्याच्या. पण, नशिब, त्याच्या वाट्याला शिक्षणही आलं. मतीन भोसले शिकले. स्वत: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक झाले. पण फासेपारधी मुलांच्या वाट्याला येत असलेल्या दुर्दशेचा डंख मनातून गेला नव्हता. आपल्या समाजातील मुलांना चांगलं आयुष्य मिळायला हवं असेल तर त्यांनी शिकायला हवं या भावनेतून मतीन भोसले यांनी नोकरी सोडली आणि सामाजिक कामाला सुरुवात केली. गुन्हेगारीकडे वळणाऱ्या फासेपारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम त्यांनी सुरु केलं. केवळ राज्यभरातूनच नव्हे झारखंड, चेन्नईसह इतर ठिकाणची रेल्वे स्टेशन, बसस्टँड, सिग्नलवर भीक मागणाऱ्या फासेपारधी समाजाच्या चार हजारांहून अधिक मुलांच्या हाती त्यांनी पाटी-पेन्सील आणि पुस्तक दिलं आहे. यासाठी त्यांनी ‘प्रश्नचिन्ह’नावाची आश्रमशाळा काढली. २०११ पासून पदरमोड करुन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे ही आश्रमशाळा ते चालवतात. या शाळेत १ ते १० वीपर्यंतचे वर्ग भरतात. सध्या ४७२ पटसंख्या आहे. आतापर्यंत चार हजारांवर विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेतलं आहे. ‘प्रश्नचिन्ह’ ही आश्रमशाळा त्यांच्या आयुष्यात आली नसती, तर यातली बहुतांश मुलं पुढे गुन्हेगारीकडे वळली असती... आणि आता? त्यांपैकी अनेक मुलं नोकरी, उद्योगाला लागली आहेत, तर काही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत.
दंगली आणि हल्लेखोरीचे गुन्हे डोक्यावर असलेला, पोलीस ठाण्यांच्या चकरा मारणारा एक खंडणीखोर, अट्टल गुंड तुरुंगाची हवा खाऊन बाहेर पडतो आणि रस्त्यावर उतरून बेघर, मरणासन्न माणसांच्या सेवेत स्वत:ला झोकून देतो; हे सिनेमात पाहिलं तरी कदाचित खोटं वाटेल... पण सांगलीत ही कथा प्रत्यक्षात घडली आहे. या अजब माणसाचं नाव मुस्तफा मुजावर. ते सांगतात, “खुनी हल्ला, खंडणी असे गुन्हे करून मी तुरुंगाची हवा खाल्ली. अट्टल गुन्हेगार म्हणून मी आत गेलो पण तिथून बाहेर पडलो तो वेगळाच माणूस होऊन. गुन्हेगारीचा मार्ग का सोडायला हवा याबाबत पोलिसांच्या ‘काउन्सिलिंग’मध्ये ऐकलेलं सगळंच्या सगळं मी स्वतःमध्ये रुजवायचं ठरवलं आणि तिथूनच माझ्यातल्या बदलाची सुरुवात झाली…चांगला माणूस होण्याच्या या प्रवासातच माणुसकी आणि सामाजिक काम या गोष्टी माझ्या अंगाला चिकटल्या. आज ती माझी सगळ्यात मौल्यवान बिरुदं आहेत.”
सांगली शहरात ‘लोकमत’ एक रुपयाला मिळत असे तेव्हा पेपरची लाइनही मुस्तफांनी टाकली आहे. दररोज पाचशे अंक टाकण्यापासून त्यांचा दिवस सुरू व्हायचा. मुस्तफांना दोन मुली. एकीचं नाव जिजा आणि दुसरीचं सारा! “छत्रपती शिवरायांच्या आईचं नाव म्हणून मी माझ्या मोठ्या मुलीचं नाव जिजा ठेवलं. मला त्यासाठी खूप त्रास देण्यात आला, पण त्या त्रासाला मी जुमानत नाही. शिवराय आणि जिजाऊंवरच्या माझ्या प्रेमाचं ते प्रतीक आहे”, असं मुस्तफा सांगतात. मुस्तफा सांगलीतील इन्साफ फाउंडेशनच्या माध्यमातून २००५ पासून सामाजिक कामात आहेत. ते दहावी अनुत्तीर्ण आहेत. पण ‘सावली निवारा केंद्रा’त बेघर लोकांची सेवासुश्रुषा करतात. बेघर, निराधार, भटक्या, रस्त्यावर मरणासन्न पडलेल्यांचं संगोपन करतात. आजपर्यंत सुमारे दीड हजार बेवारस मृतदेहांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. ६०० बेघरांना त्यांच्या कुटुंबांत नेऊन सोडलं आहे. १५० निराधारांचं पुनर्वसन करून त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. सांगलीतील निराधार केंद्रात ते सध्या ८९ भिकारी, मतिमंद, जर्जर आश्रितांचा सांभाळ करतात. दोन रुग्णवाहिकांच्या मदतीने मोफत रुग्णसेवा करतात. २५३ विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतलं आहे. ते सांगतात, आयुष्याचा खरा अर्थ मला उशिरा कळला, पण कळला हे महत्त्वाचं !
सन २०१६. रिओ ऑलिम्पिक सुरू होतं. जगातले अनेक देश पदकांवर पदकं जिंकत होते. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या, विद्वत्तेच्या दृष्टीने श्रीमंत देशाच्या हाती काही लागेना म्हणून देश अस्वस्थ होता. त्याच दिवसात पुण्यात सारस बागेजवळ चाललेला डोंबाऱ्याचा खेळ पाहत उभा होता एक युवक. त्याचे नाव शरद झरे. समोर उभारलेल्या दोन उंच काठ्या. त्यावर बांधलेल्या हिंदकळत्या दोरीवर एक चिमुरडी ढोलकीच्या तालावर, आपला तोल सावरत रुबाबात चालत होती. शरद झरे त्या मुलीकडे पाहतच राहिले. दोरीवर तोल सावरत चालणं हे असं कौशल्य आहे, जे कुठलाही ट्रेनर शिकवू शकत नाही, ते आपलं आपल्यालाच शिकावं लागतं. ही अशी गुणी, पण वंचित समाजातली लहान मुलं खेळाच्या मैदानावर चमकायला तर हवीतच, पण ती शिकायलाही हवीत, या भावनेने त्यांच्या मनाचा कब्जा घेतला... आणि सुरू झाला एक विलक्षण प्रवास. वंचित समाजातल्या मुलांना एकत्र करून त्यांना शाळेकडे, शिक्षणाकडे वळवण्याच्या प्रयत्नांचा प्रवास. ‘माणूस प्रतिष्ठान’ची स्थापना करून शरद झरे यांनी स्वखर्चाने प्रकल्प सुरू केला. कुटुंबाचा आधार हरपलेल्या तीन मुलांना सोबत घेऊन त्यांनी एका झोपडीत निवारा उभारला. बीड जिल्ह्यातील वाणटाकळीच्या डोंगरावर सुरू झालेला प्रवास लातूर जिल्ह्यातील काटगाव आणि आता बुधोडा गावात स्थिरावला आहे. पहिलीपासून दहाव्या वर्गापर्यंत शिकणाऱ्या २१ मुली आणि ४४ मुलांचे शरद झरे आणि त्यांच्या पत्नी संगीता झरे हे आई-बाबा आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, डोंबारी, घिसाडी, मसनजोगी, पारधी, भिल्ल आणि स्थलांतरित कामगारांची मुले, ज्यांचे शिक्षण थांबले आहे, अशांना झरे यांनी केवळ आसरा दिला नाही, तर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करीत मुलांच्या चौफेर विकासाचा प्रकल्प साकारला आहे.