कृषी





मुरमाड जमीन म्हणजे अपयशाची हमी, अशी ओळख बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अनेक गावांत वर्षानुवर्षे रूढ आहे. पावसावर अवलंबून असलेली, हलकी व कमी उत्पादनक्षम अशी ही जमीन अनेक शेतकऱ्यांसाठी ओझेच ठरली. अर्जुन पाटेखेडे यांनी मात्र माळरानावरील शेतीचे चित्र बदलून दाखवले. जमीन बदलणे त्यांच्या हातात नव्हते; पण शेतीकडे पाहण्याची दृष्टी त्यांनी पूर्णपणे बदलली. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात असतानाच वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या आयुष्याला अचानक वळण मिळाले. शिक्षण, करिअर आणि स्वप्ने थांबली; पण जबाबदारी स्वीकारत त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अपयश, कमी उत्पादन आणि आर्थिक अडचणी आल्या; मात्र त्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही. एकूण ३५ एकरांपैकी २५ एकर मुरमाड जमीन असल्याचे वास्तव स्वीकारून, त्यांनी शेती कसण्याची पद्धत बदलण्याचा निर्धार केला. रासायनिक खतांऐवजी त्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारला. पीक अवशेष न जाळता ते जमिनीत गाडून सेंद्रिय खत तयार केले. दरवर्षी किमान दहा एकर क्षेत्रावर मेंढी कळप बसवून जमिनीला नैसर्गिक पोषण दिले. पीक पद्धतीतही त्यांनी विविधता आणली. खरीपात कापूस, सोयाबीन व तूर मिश्र लागवड; कलिंगडात मिरची आंतरपीक; पपई बागेत टरबूज व मिरची यामुळे त्यांना दुहेरी उत्पन्न मिळू लागले. खर्च नियंत्रण हा त्यांच्या यशाचा कणा ठरला. कमी खर्च, योग्य वेळ आणि गरजेपुरती पोषणतत्त्वे या सूत्रामुळे पपईला एकरी १५ ते २५ रुपये दर, सोयाबीनचे ८ क्विंटल, तुरीचे १० क्विंटल उत्पादन मिळते. टोमॅटोमधून त्यांनी २८०० क्रेट उत्पादन घेतले. अर्जुन पाटेखेडे हे ‘भाग्यवान शेतकरी’ नाहीत, तर स्वत:चे भाग्य स्वत: लिहिणारे शेतकरी आहेत. म्हणूनच आज ते केवळ यशस्वी शेतकरी नसून, परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत.
बाळासाहेब बापुराव पाटील यांच्या हातात शिक्षकाची नोकरी होती; मात्र त्यांना समाधान मिळत नव्हते. अखेर त्यांनी धाडसी निर्णय घेत, नोकरी सोडून काळ्या मातीत रमण्याचा मार्ग निवडला. हा निर्णय अनेकांना वेड्यासारखा वाटला. नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय जवळच्यांनाही धक्का देणारा होता; पण बाळासाहेबांनी शब्दांत नव्हे, तर कृतीतून उत्तर दिले. तीस एकरांची त्यांची शेती आज केवळ वावर न राहता प्रयोगशील कृषी प्रयोगशाळा बनली आहे. सुरुवातीचे दिवस कठीण होते. उत्पन्नाची अनिश्चितता, नवे प्रयोग आणि अपयश यांचा सामना करावा लागला; मात्र त्यांनी सातत्य ठेवले. झिरो बजेट शेती, सुधारित वाणांचा वापर, कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या पद्धती यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. ठिबक व सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची टंचाई त्यांच्या शेतात कधीच अडथळा ठरली नाही. पपई, आवळा, शेवगा यांसारखी बारमाही फळपिके आणि हंगामी पिकांचे संतुलित नियोजन हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता त्यांनी जोखीम विभागली. वाढता मजुरी खर्च लक्षात घेऊन आवश्यक तिथे यांत्रिकीकरणाचा वापर केला. शंभर फूट लांबीची विहीर, दोन शेततळी, मत्स्यपालन व कुक्कुटपालन यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत तयार झाले. शेती हा त्यांचा व्यवसाय आहे; पण नफ्यासोबत टिकाऊपणाचा विचार करणारा व्यवसाय आहे. सुरक्षित चौकटीबाहेर पडून समाधानाचा मार्ग निवडणारी ही कहाणी प्रेरणादायी आहे. ती यशाच्या आकड्यांपेक्षा निवडीची आहे. सुरक्षिततेच्या चौकटीबाहेर पडून त्यांनी जे आयुष्य निवडले, त्यात कष्ट आहेत, अनिश्चितता आहे; पण त्याहून मोठा आहे तो समाधानाचा ओलावा! शेतीला मागास समजणाऱ्यांसाठी बाळासाहेबांची शेती हे जिवंत प्रत्युत्तर आहे.
महाबळेश्वर म्हटलं की लालचुटूक स्ट्रॉबेरी डोळ्यांसमोर येते; पण ही ओळख सहज मिळालेली नाही. तिच्यामागे आहे अभियंता किसन भिलारे यांची तीन दशकांची जिद्द आणि प्रयोगशीलता! मुंबईत इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर शहरात स्थिरावण्याऐवजी त्यांनी गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. महाबळेश्वरच्या मातीला जागतिक ओळख मिळवून देणे, हेच त्यांचे ध्येय होते. पारंपरिक बैठ्या वाफ्यांऐवजी त्यांनी राईज बेड, प्लास्टिक मल्चिंग व नियंत्रित सिंचन पद्धती रुजवल्या. अमेरिका, इटली, स्पेन व इजिप्त येथून रोपे आणून त्यांनी ती स्थानिक हवामानाशी जुळवून घेतली. चौदा स्ट्रॉबेरी प्रजाती यशस्वीपणे रुजवणे, ही धाडसी दृष्टी होती. हायड्रोपोनिक्स, पॉलीहाऊस व मातीविना शेतीमुळे रोप उत्पादनात आत्मनिर्भरता आली. महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला २००८ मध्ये जीआय टॅग मिळाला आणि ते भारतातील पहिले जीआय मानांकित फळ ठरले. त्यामुळे स्ट्रॉबेरी केवळ फळ न राहता जागतिक ब्रँड बनली. प्री-कुलिंग केंद्रांमुळे स्ट्रॉबेरीचे आयुष्य वाढले आणि देश-विदेशात ताजी पाठवणी शक्य झाली. एकेकाळी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी विक्रीअभावी रस्त्यावर फेकून द्यावी लागायची. आज मात्र चित्र पूर्णपणे बदललं आहे. आज रिलायन्स, बिग बाजारसह २८ कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येतात. स्ट्रॉबेरीची १९९३ मधील १३५ एकर लागवड आज ३,५०० एकरांवर पोहोचली आहे. तेवढ्यावरच न थांबता, ब्लूबेरी, रासबेरी, मलबेरीसारखी नवी फळपीकं त्यांनी शेतकऱ्यांसमोर आणली. शेती म्हणजे एकाच पिकावर अवलंबून राहणं नाही, तर सतत विस्तारत जाणारं क्षितिज आहे, हा संदेश त्यांनी कृतीतून दिला. आज किसन भिलारे हे केवळ प्रगतशील शेतकरी नाहीत. ते महाबळेश्वर तालुका फळे, फुले व भाजीपाला सहकारी विक्री संस्थेचे चेअरमन आहेत, ऑल इंडिया स्ट्रॉबेरी ग्रोवर असोसिएशनचे व्हाइस प्रेसिडेंट आहेत.
घोडेगाव इनामवस्तीच्या माळरानावर आज परदेशी भाज्यांची हिरवी चादर पसरलेली दिसते. या प्रयोगशील शेतीमागे आहेत डॉ. विलास नथुराम काळे! पुण्यात बी.एस्सी. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॅनडात ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट मिळवली. अमेरिकेत स्थायिक होण्याच्या संधी असतानाही त्यांनी आपल्या मातीला नवे रूप देण्याचा निर्णय घेतला.
मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परदेशी भाज्या येतात तरी कुठून? हा विचार करताना त्यांना एक कल्पना सुचली. या भाज्या आपणच भारतात, आपल्या शेतात का पिकवू नयेत? तिथूनच सुरू झाला एक धाडसी प्रयोग! सुरुवातीला हवामान, बियाणे आणि बाजारपेठेच्या अडचणी होत्या; पण सातत्याने प्रयोग करत त्यांनी शेती उभी केली. डॉ. काळे यांच्या शेतात डोकावलात, तर एक वेगळंच जग उघडतं. अमेरिकेत लोकप्रिय असलेली आईसबर्ग लेट्युस, पोषणमूल्यांनी भरलेली ब्रोकली, जगातील अत्यंत तिखट मानली जाणारी चायनीज मास्टर केबल मिरची, ग्रीक-जर्मन-स्पॅनिश-फ्रेंच स्वयंपाकात वापरली जाणारी चिकोरी, युरोपियन लेट्युस, अरब देशांत प्रसिद्ध झुकली, मेक्सिकन पाककृतीतील ब्रोकली, रेड रोमन, कांद्यासारखा दिसणारा फेनेल, बडीशेपसदृश स्वाद असलेला हॅबेन, करंगळीएवढे बेबी कॅरेट, कांद्याचा एक प्रकार असलेली लीक, मेंथॉलचा सुगंध असलेली रोजमेरी, अशा तब्बल ९० प्रकारच्या विदेशी भाज्या त्यांच्या शेतात नांदतात. हवामान, तापमान आणि आर्द्रतेचे अचूक व्यवस्थापन करून या भाज्या पिकवल्या जातात. ऑर्डरनुसार शेतातून भाजी तोडून थेट हॉटेल्सकडे पाठवली जाते. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ हा प्रवास अखंड सुरू आहे. आज भारतात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना त्यांच्या देशातील चवीचा भाजीपाला भारतीय मातीत उगवलेला, ताज्या स्वरूपात मिळतो आणि त्यामागे आहे डॉ. विलास काळे यांची दृष्टी! शेती ही केवळ परंपरा नसून, ज्ञान आणि बाजारपेठ यांचा संगम आहे, हे डॉ. विलास काळे यांनी माळरानातून पंचतारांकित थाळीपर्यंतचा प्रवास घडवून दाखवून सिद्ध केले आहे.
पहाटे शेतांत फेरफटका मारला तर, हवामान मोजणाऱ्या यंत्रावर नजर ठेवणारा एक तरुण हमखास दिसतो. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व पर्जन्यमान यांच्या आधारे शेतीचे निर्णय घेणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे विशाल रामेश्वर अग्रवाल! बी.ई. मेकॅनिकल शिक्षण घेतलेल्या या तरुणाने आरामदायी नोकरीऐवजी शेतीला कार्यक्षेत्र मानले. पारंपरिक शेतीवर समाधान न मानता त्यांनी केळी, कपाशी, तूर, पपई व हरभरा पिकांत आधुनिक तंत्रज्ञान वापरले. ऊतीसंवर्धित केळी रोपे, मल्चिंग, ठिबक व तुषार सिंचन, बड इंजेक्शन आणि स्वयंचलित हवामान केंद्रामुळे उत्पादनात सातत्य आले. हवामानाचा अचूक अंदाज आणि त्यानुसार सिंचन व संरक्षण, यामुळे त्यांना केळी उत्पादनात सातत्य राखता आले. पाण्याचे महत्त्व त्यांनी कृतीतून दाखवले. नाला सरळीकरण, खोलीकरण, विहीर पुनर्भरण व आडवे बांध घालून पावसाचा प्रत्येक थेंब अडवला. देश-विदेशातील शेतीच्या अभ्यासासाठी त्यांनी तामिळनाडू, इस्रायल, फिलिपिन्स व थायलंडचे दौरे केले. त्यांच्या याच अभ्यासातून रावेरच्या केळीला परदेशी बाजाराची वाट सापडली. कोरोना काळात केळीचे दर कोसळले असतानाही त्यांनी ‘मॅक्स फ्रेश फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ स्थापन करून ३५० शेतकऱ्यांना एकत्र आणले आणि निर्यात साधली. जळगावातून २००६ मध्ये केवळ पाच कंटेनर केळी निर्यात होत होती. ती २०२५ मध्ये दहा हजारांवर पोहोचली. या वाढीत विशाल अग्रवाल यांचे योगदान निर्णायक आहे. त्याच वर्षी केलेल्या रशियाच्या अभ्यास दौर्यात त्यांच्या लक्षात आले, की जगात सर्वाधिक केळी आयात करणाऱ्या रशियात भारताची केळी अजून पोहोचलेली नाही. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. विशाल अग्रवाल यांची कहाणी वैयक्तिक यशापुरती मर्यादित नाही. भारत कृषीमाल आयात नव्हे, तर निर्यात करणारा देश व्हावा, अशी त्यांची व्यापक दृष्टी आहे.